महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार? माजी मुख्यमंत्र्याचा मोठा दावा
![Prithviraj Chavan said that there will be another political earthquake in Maharashtra](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/Eknath-Shinde-Ajit-Pawar-and-Devendra-Fadnavis-780x470.jpg)
मुंबई | शिवसेना आमदार अपात्रेबाबत विधानसभा अध्यक्षांसमोरील सुनावणी पूर्ण झाली असून आज (१० जानेवारी) या प्रकरणाचा निकाल दिला जाणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दुपारी चार वाजता त्यांचा निर्णय जाहीर करणार आहेत. या निकालाकडे संपुर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. यावरून बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा दावा केला आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, पक्षांतर कायदा बदलायला हवा आणि याचे राजकीय परिणाम वाईट आहेत. १६ आमदार जर अपात्र झाले. शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांचं पद गेलं तर राजकीय भूकंप होईल. घटनात्मक तरतूद काय आहे हे पाहायला हवं. आजचा निकाल हा अतिशय महत्त्वाचा राजकीय निर्णय असेल. घटनात्मक पाहिलं तर पक्षांतर बंदी कायदा १९८५ साली आला. या कायद्याचं उद्दिष्ट पूर्ण झालेलं नाही. या कायद्याला बदलायला हवं.
हेही वाचा – पेट्रोल-डिझेल टँकर चालक संपावर; राज्यात पुन्हा इंधन टंचाईची शक्यता!
१६ आमदारांना रद्द केलं पाहिजे ही कायदेशीर बाब झाली. पण विधानसभा अध्यक्ष कुठल्या तरी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी असतात आणि ते त्या पक्षाचे हित बघणार नाहीत, असं होणार नाही. या निकालाला दीड वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागला. आज ४ वाजता काय निर्णय होईल हे पाहावं लागेल, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला गेलेले. मी कधी याआधी पाहायला मिळालं नव्हतं. चुकीचा पायंडा पाडला गेला आहे. विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्री यांना भेटायला जाणे हे चुकीची बाब आहे. जर निकाल वेगळा आला तर आम्ही सुप्रीम कोर्टात न्याय मागू. लोकसभा निवडणुकीत भाजपकडून वारंवार विजयाचा दावा केला जातो. त्यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपवाले ४५ पार जागांवर विजय मिळेल म्हणतात. पण ४८ पार जिंकू असं का म्हणत नाहीत? असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.